महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठल्याही उमदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नसली, तरी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावांची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. खुद्द शिंदे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु अद्याप अधिकृतरित्या उमेदवारी घोषित करण्यात आलेली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडू शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आल्याची बातमी शुक्रवार रात्रीपर्यंत समाज माध्यमांवर फिरत होती. एका वृत्तपत्रामध्ये विधानपरिषद उमेदवारीसोबत शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष देण्यात येत असल्याची बातमी छापून आली आहे. त्यावर शनिवारी सकाळी शिंदे यांनी आपल्या ट्विटर हृडलवरून खुलासा केला आहे.
याबाबत ते म्हणाले की, एका वर्तमानपत्रात विधानपरिषद निवडी सोबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या चर्चेची बातमी आलेली आहे, प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या बातमीत कोणतेही तथ्य नसून फक्त विधानपरिषद निवडी संदर्भात माझं नाव चर्चेत आहे. दुसरी कोणत्याही प्रकारची चर्चा सद्य परिस्थितीत नाही.
हेही वाचा - खडसे, मुडेंना पुन्हा डावललं, भाजपने केली विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा
एका वर्तमानपत्रात विधानपरिषद निवडी सोबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या चर्चेची बातमी आलेली आहे, प्रदेशाध्यक्ष निवडी बाबतच्या बातमीत कोणतेही तथ्य नसून फक्त विधानपरिषद निवडी संदर्भात माझे नाव चर्चेत आहे. दुसरी कोणत्याही प्रकारची चर्चा सध्य परिस्थितीत नाही.
— Shashikant Shinde (@shindespeaks) May 8, 2020
शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात झालेल्या उदयनराजेंविरूद्धच्या लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी सर्व जोर पणाला लावला होता. तर अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्याशिवाय राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालाताई चाकणकर यांचंही नाव चर्चेत आहे.
दरम्यान भाजप आणि शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपकडून डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजित सिंग मोहिते यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
२१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विधान परिषदेत रिक्त झालेल्या ९ जागांपैकी भाजपच्या ३, राष्ट्रवादी ३, काँग्रेस २ आणि शिवसेना १ अशा जागेचा समावेश आहे. विधानसभेत निवडून आलेले २८८ आमदार या ९ जागांसाठी मतदान करतील. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ मे आहे. २४ एप्रिल रोजी होणारी ही निवडणूक कोरोना संकटामुळे पुढं ढकलण्यात आली होती.
हेही वाचा - विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे, निलम गोऱ्हेंचं नाव निश्चित