मुंबई - राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांचा राडा नुकताच संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. एक राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष आणि दुसरे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते. या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या अशा वागण्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची उरली सुरली इज्जतही धुळीस मिळाली. मात्र आता या दोघांमध्ये समेट घडवून आणण्याची जबाबदारी उचललीय चक्क राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी.
या दोन नेत्यांच्या अशा वागण्याचा विरोधकांनीही खरपूस समाचार घेतलाय. जर मोठ्या पक्षांच्या नेत्यांचं वागणं असं असेल तर राज्याच्या राजकारणाला धोक्याची घंटा असल्याचं सांगत विरोधकांनी टीकेची झोड उठवलीय.
आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच पराभवाचं चिंतन करण्यापेक्षा राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या उरावर बसलेत . दरम्यान पक्षातील दोन्ही गटही एकमेकांविरोधात अधिक आक्रमक झालेत. त्यातच युवक राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय दिना पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. त्यामुळे पक्ष पोखरणारा हा वाद मिटवण्याचं मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे.
या प्रकरणात आतापर्यंत दोन्ही गटाच्या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.