आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचं असल्यामुळं स्थानिक पातळीवर त्यांच्याशी जमवून घ्या,' असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
राज्यात होऊ घातलेल्या ५ महापालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चा झाली. 'आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचं आहे. महाविकास आघाडी झाल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला सेनेबरोबर जुळवून घ्यायचं आहे. त्यामुळं शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्यावं,' अशा स्पष्ट सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध महामंडळावरील नियुक्त्या लवकरच होणार असल्याचे संकेत ही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यासह मंत्री, वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. तसेच, मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमदेवारांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले होते.