Advertisement

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू, भाजपचा इशारा

मराठा तरुणांवर राज्य सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली, अशी टीका करतानाच ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू, भाजपचा इशारा
SHARES

महाराष्ट्र विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठा तरुणांवर राज्य सरकारमुळे घरी बसण्याची वेळ आली, अशी टीका करतानाच ओबीसी आरक्षणात कोणी वाटेकरी करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिला आहे. 

विधानसभेतील सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आमच्या काळात मराठा आरक्षणावर स्थगितीची वेळ येऊ दिली नाही. परंतु आता हे प्रकरण घटनापीठाकडे गेल्यावरही मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम आहे. राज्य सरकारला आरक्षणावरील स्थगिती उठवण्यात आलेल्या अपयशामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाने विचारलेलं नसतानाही ‘आ बैल मुझे मार..’ म्हणत आम्ही भरती करणार नसल्याचं सरकारने सांगून टाकलं. यामुळे नोकऱ्या मिळालेल्या मराठा तरूणांवरही घरी बसण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा- नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून सर्वांसाठी लोकल ट्रेन?

आमच्या काळात देखील मराठा आरक्षणासाठी आंदोलन, मोर्चे झाले. पण कधी कोणाला अटक झाली नाही. कोणाला मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका असं झालं नाही. आज तर एका प्रकारे आणीबाणीच लागली आहे. मराठा समन्वयकांना अटक होते, मुंबईत येऊ नका असे आदेश काढले जातात. एका बाजूला चर्चाही करायची नाही आणि दुसरीकडे आंदोलन देखील करायचं नाही, अशा सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजात संताप निर्माण होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. सरकारमधील मंत्रीच घटनाबाह्य पद्धतीने मोर्चे काढत असल्याचं दिसत आहे. मेळावे घेत आहेत. सरकारी पक्षातील नेतेच विरोधी भूमिका घेत तेढ निर्माण करणार असतील तर कायदा सुव्यवस्था कशी टीकेल?  ओबीसी आरक्षणात कोणालाही वाटेकरी करणार नाही हे मंत्रीमंडळात सांगायची गरज आहे, तसा ठराव घ्या, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केली आहे.

धनगर समाजासंदर्भात आम्ही केलेल्या सर्व योजना बंद आहेत. सरकारच्या मनात नेमकं काय आहे हे आम्हाला समजत नाही. यामुळे वेगवेगळ्या घटकांच्या मनात सरकार गोंधळ निर्माण करत असून हा गोंधळ दूर झाला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

(opposition leader devendra fadnavis criticises maharashtra government over maratha reservation in assembly winter session)

हेही वाचा- मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा