मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशा (एमएमआर)मधील नागरिकांना अत्याधुनिक वाहतूक सुविधा पुरवणं हेच सरकारचं मुख्य ध्येय आहे. त्यानुसार २०१४ पासून केंद्रासह राज्यसरकारनं 'एमएमआर'मधील मेट्रो प्रकल्पाला वेग दिला आहे. या कामाच्या माध्यमातून २०२२ पर्यंत 'एमएमआर'मध्ये २७५ किमीच्या मेट्रो मार्गाचं जाळं विणत मुंबईसह एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था बळकट केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
मोदी मुंबई-कल्याण आणि पुण्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी राजभवन इथं ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारीत 'टाइमलेस लक्ष्मण' या पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्यानंतर ते हेलिकाॅप्टरने कल्याणला पोहोचले. दुपारी अडीचच्या दरम्यान त्यांनी कल्याण येथील वासुदेव बळवंत फडके मैदानावर मेट्रो-५ आणि मेट्रो-९ चं भूमिपूजन केलं. तर सिडकोकडून नवी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ९० हजार घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते झालं.
Kalyan: PM Narendra Modi lays foundation stone of two metro corridors — Thane-Bhiwandi-Kalyan Metro&Dahisar-Mira-Bhayander Metro and CIDCO housing scheme in Maharashtra. pic.twitter.com/x551SdwOj0
— ANI (@ANI) December 18, 2018
मोदींनी मराठीतून भाषणाला सुरूवात करत उपस्थितीतांना आश्चर्याचा धक्का दिला. महाराष्ट्र भूमी ही शाहू-फुले-आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, तानाजी मालुसरे अशा वीरांची भूमी असून या भूमिला मी वंदन करतो, असं म्हणत भाषणाला सुरूवात केली. मुंबई आणि 'एमएमआर'मधील पायाभूत सोयी-सुविधा वाढवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत याचा पाढा यावेळी मोदींना वाचला. तर प्रत्येकाला हक्काचं घर ही घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत हे यावेळी मोदींना सांगितलं.
एकीकडे भाजपा सरकारकडून गेल्या ४ वर्षांत एमएमआरच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काय काय केलं हे सांगतानाच दुसरीकडे काँग्रेसनं काय नाही केलं हे ही सांगण्यास मोदी विसरले नाहीत. काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी यावेळी सोडली नाही.
काँग्रेसनं ८ वर्षांत जिथं २५ लाख ५० हजार घरं बांधली तिथं भाजपा सरकारनं ४ वर्षात १ कोटी २५ लाख घर बांधली. तर काँग्रेसच्या काळात ११ किमीचा एक मेट्रो मार्ग तयार व्हायला ८ वर्षे लागली. मात्र, भाजपानं २०१४ नंतर मेट्रो प्रकल्पाला वेग देत कित्येक किमीच्या मेट्रो कामाला सुरूवात केली आहे. त्यानुसार २०२२ पर्यंत मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशा (एमएमआर)मध्ये २७५ किमीचं मेट्रोचं जाळ तयार होणार असल्याचंही यावेळी मोदींनी सांगितलं.
हेही वाचा-
सेना-भाजपा, भूमिपूजन आणि मानापमान
कोस्टल रोडच्या भूमीपूजनात मुख्यमंत्र्यांना डावललं