Advertisement

शेतकरी संपाच्या नेतृत्वासाठी राज ठाकरेंना साकडं


शेतकरी संपाच्या नेतृत्वासाठी राज ठाकरेंना साकडं
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणतांब्याला जाऊन संपकरी शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. राज ठाकरे यांनी पुणतांब्याला येऊन आंदोलनाचे नेतृत्व करावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालीच हा लढा सुरू राहील, अशी भूमिका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.

'मी स्वतः 2 जूनला पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तेव्हा मी त्यांना सांगितले होते राज ठाकरे यांचा तुम्हाला कायमच पूर्ण पाठिंबा असेल. परंतु त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी जादूची कांडी फिरवून शेतकरी आंदोलनात फूट पाडली. त्यामुळे शेतकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीला विलंब झाला', अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

दरम्यान, यावेळी मुरलीधर थोरात या ज्येष्ठ शेतकऱ्याने राज ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. त्यावेळी 24 तास विद्युतपुरवठा, शेतमालाला हमी भाव मिळावा या मागण्या शेतकऱ्यांच्या असल्याचे त्यांनी राज ठाकरे यांना सांगितले. तसेच शिवसेनेच्या भूमिकेवर देखील त्यांनी यावेळी शंका उपस्थित केली. दरम्यान, शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर 15 दिवसांत आम्ही निर्णय घेऊ, असे आश्वासन राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा