नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या मुजोरीला उत्तर म्हणजे ५ राज्यांच्या निवडणुकीतील भाजपाचा पराभव असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं तोंडभरून कौतुक करतानाच राज यांनी ३ राज्यांतील विजयाबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. भाजपावर ही वेळ येणारच होती. कारण थापेबाजी जास्त काळ चालत नाही. त्यामुळे ही तर येणाऱ्या लोकसभेची नांदी अाहे, असं म्हणत राज यांनी २०१९ मध्ये देश भाजपामुक्त होईल, असंही भाकीत त्यांनी केलं. ५ राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपाला नाकारण्याचं धाडस मतदारांनी दाखवलंच, पण हा पायंडा खऱ्या अर्थानं घातला तो गुजरातच्या जनतेनं. मोदींना होमग्राऊंडवर त्यांची जागा दाखवून दिली ती गुजरातच्या जनतेनं. जिथं १६५ जागा यायला हव्या होत्या, तिथं ९९ च्या वर भाजपाला मतदारांनी अडवलं. त्यामुळं गुजरातच्या जनतेचं आधी अभिनंदन. त्यानंतर कर्नाटक आणि आता या ५ राज्यात मतदारांनी धाडस दाखवलं, असंही राज ठाकरे म्हणाले.
मोदी आणि शहांची भाषा मुजोरीची होती आणि या मुजोरीला मतदारांना उत्तर दिलं आहे असं म्हणत मोदींना टोला लगावला आहे. जनतेनी किती थापा एेकायच्या, वस्तुस्थिती का आहे हे जनतेला आता माहिती झालं आहे हेही आजच्या निकालातून स्पष्ट झालं आहे. मोदींनी आणि भाजपानं ४ वर्षात काही केलंच नाही. त्यामुळं जनतेसमोर जायला त्यांना काहीच मुद्दा नाही. तेव्हा भावनेचा आधार घ्यायचा आणि हेच करत त्यांनी राम मंदिराचा मुद्दा पुढं आणला आहे, अशा शब्दातही राज यांनी भाजपावर टीका केली आहे. मुळात राम मंदिराची नव्हे, तर राम राज्याची गरद असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
तीन राज्यात काँग्रेसला आज जे यश मिळालं आहे ते एकट्या राहुल गांधींनी मिळवल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी राहुल गांधीचं यावेळी तोंड भरून कौतुक केलं आहे. गुजरातमध्ये राहुल गांधी एकटे होते, कर्नाटकमध्ये राहुल गांधी एकटे होते आणि आजही राहुल गांधी एकटे होते पण त्यांनीच भाजपाला रोखल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. पप्पू म्हणून राहुल गांधींना हिणवणाऱ्यांचाही समाचार त्यांनी यावेळी घेतला.
राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना राज्य सरकार मात्र दुष्काळाबाबतीत गंभीर नसल्याच म्हणत राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारवरही यावेळी टीका केली आहे. राज्याला स्वतंत्र कृषीमंत्री नाही यावरूनच सरकार दुष्काळबाबत किती गंभीर आहे हे समजत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी उर्जित पटेल यांचा राजीनामा म्हणजे मोठ्या धोक्याची घंटा असल्याचं म्हणत भाजपाकडे संशयाचं बोटही दाखवलं आहे.
हेही वाचा-
मोदी जानेवाले है, राहुल आनेवाले है- अशोक चव्हाण
मतदारांनी जे नको ते नाकारलं- उद्धव ठाकरे