लोकांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. भाजपाला इतक्या जागा मिळणं अनपेक्षित होतं. पण मनसेचे उमेदवार असते तर वेगळं चित्र असतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक निकालावर व्यक्त केलं.
निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी ईव्हीएमवर लोकांना संशय असल्याचे मत व्यक्त केलं. लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका आहे. राजीव गांधींच्या काळात काँग्रेसची कामगिरी चांगली होती. पण तेव्हा कोणी निवडणूक प्रक्रियेवर संशय घेतला नव्हता. भाजपाला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होतं, असंही ते म्हणाले.
नातू पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल विचारलं असता पवार म्हणाले की, मावळ मतदारसंघातून कधी आमचा उमेदवार निवडून नव्हता आला. तो मतदारसंघ जिंकून येणारा नव्हता. त्यामुळे न येणाऱ्या जाग्यावर निवडणूक लढवून बघावी, असा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिथे चांगलं काम केलं. पार्थसाठी तुम्ही निवडणूक लढवली नाही का असं विचारलं असता, २०१४ ला मी निवडणूक लढलो नव्हतो. त्यामुळे २०१९ मध्येही निवडणूक लढणार नाही असा मी निर्णय घेतला होता. त्यामुळे मी निवडणूक सोडली, असे म्हणण्यात काही तथ्य नाही असं पवार म्हणाले.