मुंबईचा सर्वाधिक व्यवहार पंजाब आणि दिल्ली अशा शहरांशी होतो. तिथूनच मालाची ने-आण करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक रस्ता हा गुजरातला जोडूनच पुढे जातो आणि यांत काही गैर नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गुजरातच्या कनेक्शनवर दिलं. तसंच शरद पवार यांनी यांनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते एक मोठे आणि प्रगल्भ नेते असून आपण त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते.
महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही महाराष्ट्रातील रस्त्यांची लांबी वाढली आहे. रस्ते विकासासाठी २ लाख ८२ हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यात मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे मुंबई-गोवा महामार्गामधील जमीन संपादन या मुख्य अडथळ्यासह बहुतेक अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे मार्च २०१९ पर्यंत मुंबई गोवा मार्गाचं चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली.
मुंबई ते गोवा जलवाहतुसाठीही आपण प्रयत्नशील असून त्यासाठी परदेशी कंपनीला आराखडाही तयार करण्यास सांगितलं आहे. मुंबई-अलिबाग रोरो सेवाही लवकरच सुरू होईल. या दरम्यान नदीजोड प्रकल्पांना सरकार जास्त महत्त्व देत असून जलवाहतुकीसाठी सागरमाला प्रकल्प महत्त्वाचा असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
'जेएनपीटी' प्रकल्पातून अनेकांना रोजगार मिळणार असल्याचं सांगत मुंबईकरांना लवकरच मुंबई ते गोवा क्रूझप्रवास उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बंदरे, रेल्वे आणि रस्ते एकमेकांना पूरक कसे ठरतील, यावर सरकार भर देत असल्याचंही ते म्हणाले.