Advertisement

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी 'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक


विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी 'वर्षा'वर आघाडीच्या नेत्यांची बैठक
SHARES

येत्या ५ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवड व्हावी, म्हणून काँग्रेस पक्ष आग्रही असला, तरी आघाडीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मतभिन्नता असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत अध्यक्ष निवडीवरून विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. सध्या कोरोनाचे संकट कायम आहे. कोरोनामुळे अधिवेशन २ दिवसांचे होईल. अधिवेशनाआधी आमदारांची कोरोना चाचणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड पुढे ढकलता येईल किंवा कसे, यावरही बैठकीत खल झाला.

मुंबईत होणाऱ्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात नवीन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्याच वेळी विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर २०२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अद्यापही अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आलेली नाही.

पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत. तथापि, राज्यपालांना १२ नामनिर्देश आमदारांबाबत दिलेल्या पत्राचे काय झाले? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरील व्यक्तींनी पदाचा सन्मान राखणे गरजेचे आहे. मात्र, राज्यपालांना त्याचा विसर पडला आहे, असा चिमटा पटोले यांनी काढला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा