मुंबई - राज्यातल्या नगरपालिका निवडणुकांसाठी झालेल्या शिवसेना-भाजपा युतीचे पडसाद मुंबईत उमटू लागले आहेत. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या इच्छुक उमेदवारांमधून नाराजीचे सूर उमटू लागलेत. मुंबईत दोन वर्षांपासून शिवसेना-भाजपामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांचं युद्ध सुरू आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक आमदार असल्यानं फेब्रुवारीमध्ये होणारी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. शिवसेना-भाजपामधील वादामुळे मुंबईत युतीची शक्यता कमी आहे, असं समजून अनेकांनी भाजपामध्ये इनकमिंग सुरू केलं होतं. मात्र आता युतीचे वारे पुन्हा वाहू लागल्यानं भाजपामध्ये येणाऱ्या इच्छुकांनी धसका घेतला आहे.