संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत गुजरातला मुंबई खेचता आली नाही. ही सल अजूनही गुजरातच्या मनात कायम आहे. म्हणूनच आजही मुंबई मिळवण्याचा, मुंबईला महाराष्ट्रपासून वेगळं करण्याचा प्रयत्न होतोय. त्यासाठीच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा घाट घातला जातोय का? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारताच कुणी वरून जरी आलं, तरी त्याला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करत येणार नाही, असं सणसणीत उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं.
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न होतोय, असं सांगतानाच मुंबईला महाराष्ट्रापासून कुणीही वेगळं करू शकणार नाही, हे उत्तर देऊन पवार यांनी मुंबईला वेगळं करण्याचा डाव आखणाऱ्यांना चांगलीच चपराक मारली. त्यांच्या या उत्तराने तमाम मुंबईकर आणि मराठी माणूस नक्कीच सुखावला असेल.
'जागतिक मराठी अकादमी' आयोजित 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या खास मुलाखतीत राज यांनी विचारलेल्या ठाकरी शैलीतील प्रश्नांना पवारांनी मुसद्दीपणाने उत्तरं दिली. मुंबई, महाराष्ट्रापासून ते देशातील राजकारणावर राज यांनी प्रश्न विचारत पवारांना 'बोलतं' केलं.
पंतप्रधानांसाठी राज्य महत्वाचा की देश? असा प्रश्न मला पडतो. कारण मोदी परदेशातील कुठलाही पंतप्रधान आला की त्यांना मिठी मारत केवळ अहमदाबाद दाखवतात. इतर राज्यातील एखादं शहर का दाखवत नाहीत? असा प्रश्न राज यांनी विचारताच, पंतप्रधान असो वा कुठलाही राजकारणी, सगळ्यांसाठी आधी देश मग राज्य असाच प्राधान्यक्रम असला पाहिजे, असं परखड मत व्यक्त करत पवार यांनी गुजरात प्रेमावर मोदींना कानपिचक्या दिल्या.
आरक्षणाच्या विषयावर राज यांनी पवारांना बोलतं केलं. एकीकडे खासगीकरण होतं असताना, सरकारी नोकऱ्या नसताना अन्य समाजाकडून सातत्याने आरक्षणाची मागणी होत आहे. यावर बोलताना पवारांनी दलित आणि आदिवासी याचं आरक्षण आहे तसंच ठेवावं आणि इतरांसाठी आर्थिक निकषांवर आरक्षण दयावं अशी स्पष्ट भूमिका घेतली. मराठा आणि इतर समाजच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना पवारांनी मांडलेली ही भूमिका अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला खूप काही शिकवलं त्यामुळेच त्याच्या जाण्याने मी खूप अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर ज्यांच्या जाण्याने जीवाला चटका लागला ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं सांगत पावारांनी मुलाखतीत बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.