'आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीच्या आधीच ठरला होता. युतीत जागावाटपाच्या बाबतीत कुठलाही तिढा नसून येत्या १ ते २ दिवसांत युतीची घोषणा होईल,' अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना भवनात शिवसेना नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.०
विदर्भातील शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव यांनी भाजप-शिवसेना युतीबाबतच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
उद्धव यांनी शिवसेना नेत्यांसोबत जागावाटपासंदर्भात सुमारे तासभर चर्चा केली. शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळणार असतील, तरच युतीवर शिक्कामोर्तब होईल,' असं उद्धव यांनी या बैठकीत शिवसेना नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांकडून समजत आहे. पण सन्मानजनक जागा म्हणजे किती याचा नेमका आकडा कळू शकलेला नाही.
शिवसेना-भाजपमध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्मुला ठरला असून शिवसेना त्यावर समाधानी आहे, अशी चर्चा आहे. परंतु पत्रकारांसोबत बोलताना १३५-१३५ जागांचा फॉर्म्युला मीडियानेच पसरवल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यामुळे संभ्रम वाढला आहे.
उद्धव यांना आरेबाबत प्रश्न विचारल्यावर 'आरे'बाबतची शिवसेनेची भूमिका लोकभावनेला धरून आहे. तर नाणारचं जे काही व्हायचं आहे, ते आधीच झालेलं आहे, असं ते म्हणाले. तसंच राम मंदिरासंबंधी मी कोणतंही वक्तव्य करत नसून फक्त भावना व्यक्त करत आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायव्यवस्था कोणत्याही हस्तक्षेपाला बळी न पडता न्याय देत असल्याने हा न्याय निष्पक्ष असतो,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
तसंच शिवसेनेने गेल्या ५ वर्षात कधीही सरकारला दगा दिला नसून ५ वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा मोलाचा सहभाग असल्याचा आनंद असल्याचं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी मुंबईत
युतीबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तिघांनाच, महाजन यांचा रावतेंना टोला