राज्यात आगामी विधान निवडणुकीचे वारे वाहत असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत अाहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागा वाटपावरून दोन्ही पक्ष सहमत नसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. दरम्यान, येत्या रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी मुंबईत येणार आहेत. त्यावेळी याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
रविवार २२ सप्टेंबर रोजी काश्मीरवरील कलम ३७० रद्द करण्याबाबत मुंबई भाजपतर्फे व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्याख्यानासाठी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार आहेत. गोरेगाव इथं सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा युतीच्या जागावाटपाच्या चर्चेत लक्ष घालणार का याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
ठरल्याप्रमाणे जागा मिळणार नसतील तर युती कठीण असल्याचं विधान शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं. त्यावर जागावाटपाच्या चर्चेत अधिकार नसलेल्यांनी युतीबाबत बोलू नये, असं भाजपचे नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीतीलं हा जागावाटपाचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी
भारतात मुंबई आयआयटी अव्वल स्थानी