एका बाजूला भाजपसोबत जागा वाटपाची बोलणी सुरू असताना शिवसेनेकडून ५ ते १० विद्यमान आमदारांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आमदारांच्या जागी शिवसेनेत दाखल झालेल्या आयारामांना विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात नेते भाजप-शिवसेनेत दाखल झालेत. जागा वाटपाच्या बोलणीत भाजपकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असताना शिवसेना देखील स्वबळावर २८८ जागा लढवण्याची चाचपणी करत आहे.
भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा यशस्वी झाली, तर ठिक अन्यथा २८८ जागा लढवताना शिवसेनेकडून आयात उमेदवारांसोबत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेना खराब कामगिरी असणाऱ्या काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे.
काही विद्यमान आमदारांबद्दल नाराजी असताना त्यांच्या जागी संधी मिळावी म्हणून शिवसेनेचे अनेक पदाधिकारी देखील उत्सुक आहेत. परंतु निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी होऊ नये म्हणून शिवसेनेकडून आयत्या वेळेला उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा-
सावरकर पंतप्रधान असते, तर पाकिस्तान जन्मालाच आला नसता- उद्धव ठाकरे
आघाडीचं सबुरीचं धोरण, युतीच्या जागावाटपाकडे नजर