औरंगाबादमध्ये एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी सभा घेतली होती. सभेपूर्वी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतलं आहे. कबरीचे दर्शन घेण्यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ओवैसी बंधूंवर निशाणा साधला आहे.
औरंगजेबाला मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले आहे. तुम्ही जर आम्हाला आव्हान देणार असाल तर आम्ही तुमचे आव्हान स्वीकारून त्याच मातीमध्ये गाडू असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले हा काही रितीरिवाज नाही. वारंवार संभाजीनगरमध्ये यायचे आणि महाराष्ट्राला खिजवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यामधून अशांतता निर्माण करायची, असे या ओवेसी बंधूंचे राजकारण दिसते.
मी इतकंच सांगेन, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठ्यांना बांधली आहे. त्याला कबरीमध्ये आम्ही टाकले आहे. महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंत औरंगजेब २५ वर्षे लढत राहिला. तुम्ही आज औरंगजेबाच्या कबरीवर येऊन नमाज पडताय, कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावं लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्यासोबतच नितेश राणे यांनी देखील ओवेसींवर टीका केली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करून अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर आगपाखड केली. आम्ही शिवरायांचे मावळे नाहीत. मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर, आम्ही शिवरायांचे मावळे नाही, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही आगपाखड केली आहे. काहीही केले तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल, कारण राज्यात "नामर्दांचे सरकार आहे", ही गोष्ट अकबरुद्दीन ओवेसी यांना माहिती आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले.
हेही वाचा