महात्मा फुले यांची पगडी ही समतावादी विचारधारेची आहे. समाजातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विषमता दूर करणारा हा विचार आहे. त्याला विरोध करण्याचं कारण काय ? असा सवाल करत महात्मा फुलेंच्या पगडीला विरोध असल्याचं शिवसेनेनं जाहीर करावं, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलं आहे.
बुधवारी सामनामध्ये आलेल्या पगडीबाबतच्या अग्रलेखातील राजकारणावर नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना शिवसेनेला प्रतित्युत्तर देताना जाहीर आव्हान दिलं आहे.
गेले चार दिवस या पगडीवर राजकारण सुरु आहे. शरद पवारसाहेबांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची पगडीचा वापर करा असा आदेश दिलेला आहे. आमचा पक्ष शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा आहे आणि या विचाराला काही लोक घाबरत आहेत. ती प्रतिगामी शक्ती आहे. समतामुलक समाज निर्माण झाला पाहिजे. मागासवर्गीयांना, ओबीसींना,समाजातील खालच्या थरातील लोकांना शक्ती मिळाली पाहिजे. परंतू त्यांना हे मान्य नाही. ते लोक गेली चार दिवस घाबरलेले आहेत, असंही नवाब मलिक म्हणाले.
ज्यांना सावरकरांचे विचार चालवायचे असतील तर त्यांनी चालवावेत. पण हे इतकं पगडीला का घाबरत आहे. पगडीमुळं सगळे विचलीत का झाले आहेत, असा सवालही त्यांनी केला. काही लोक सांगत आहेत की ही पेशवाईची पगडी आहे. ज्यांना जे अर्थ काढायचे असतील तर ते काढू देत. आम्ही त्या पगडीबद्दल काही बोलत नाही, असंही नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा -
राहुल गांधींनी 2.47 मिनिटांत उरकली पत्रकार परिषद
माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे झाले काँग्रेसवासी!