पंतप्रधान अावास योजनेप्रमाणेच अाता झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणमधील (एसअारए) रहिवाशांना ३० चौ. मीटर (३२१ चौरस फुटांपेक्षा जास्त) क्षेत्रफळाचं घर मिळणार अाहे. याबाबतचा सर्वंकष अभ्यास करण्यासाठी एक समिती शासनानं नेमली अाहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी '२०२२ पर्यंत सर्वांना घरे' या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली अाहे. या योजनेंतर्गत सर्वांना ३० चौरस मीटर क्षेत्रफळाची घरे देण्याची तरतूद अाहे. मात्र एसअारएअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन योजनांसाठी २५ चौरस मीटरची घरे दिली जातात. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील निवासी संदनिकांच्या बाबतीतही राज्य सरकारचं धोरण केंद्र सरकारप्रमाणेच असावे, यासाठी राज्य सरकारने ‘एसआरए’ योजनेतील घरांनाही ३० चौरस मीटर क्षेत्रफळाचे (३२१ चौरस फुटापेक्षा जास्त ) घर देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.
एसआरए योजनेसाठी ३० चौरस मीटर क्षेत्रफळाचे घर दिल्यास, सध्या सुरू असलेल्या योजनांमधील घरांबाबत काय निर्णय घ्यायचा, याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.