Advertisement

राज्यातील जीम तात्काळ सुरू करा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील जीम तात्काळ सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

राज्यातील जीम तात्काळ सुरू करा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
SHARES

राज्यातील दारूची दुकाने उघडली जात असताना जीम मात्र बंद ठेवल्या जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. राज्याचं अर्थकारण टिकलं पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण राज्याचं आरोग्यसुद्धा टिकलं पाहिजे. हा विचार आपण का करू शकत नाही? असा प्रश्न उपस्थित करत राज्यातील जीम तात्काळ सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. (start gym immediately in maharashtra demands bjp leader devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादं संकट येतं, तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही, तर त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणामसुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ टिकून राहील याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे.

खरं तर कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनितीच चुकली आहे. ज्या काळात आपण चाचण्यांवर भर द्यायला हवा होता, त्या काळात चाचण्या केल्या नाहीत. नंतर चाचण्या वाढल्या, हे भासवण्याचा प्रयत्न झाला. संख्यावृद्धीसाठी अँटिजेन चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी आज स्थिती अवघड झाली आहे. महाराष्ट्र हा देश असता, तर जगात सहाव्या क्रमांकावर आपण आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे

सर्व क्षेत्रात कायम आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने आज खरेतर ‘अनलाॅक’च्या बाबतीसुद्धा आघाडी घेतली पाहिजे. पण दुर्दैवाने तसं होताना दिसून येत नाही. केश कर्तनालये अन्य राज्यांमध्ये आधी उघडण्यात आली. महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आज जीम सुरू करण्यासाठीसुद्धा लोकं आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती येत आहेत. यासंदर्भात होणाऱ्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाय करीत आता आपल्याला हळुहळू सर्व बाबी खुल्या कराव्याच लागतील. त्याशिवाय पर्याय नाही. फार काळ आपण लोकांच्या अर्थकारणावर निर्बंध घालू शकत नाही. एकतर सरकार स्वत:हून प्रत्येक क्षेत्राला खुले करण्यासाठी काही अभ्यासपूर्ण शिफारसी करायला तयार नाही. त्यात ते-ते क्षेत्र कोरोना प्रतिबंधाची काळजी कशी घेणार या बाबतचा तपशील सरकारला सादर करून ती क्षेत्र खुली करण्याची विनंती करत आहेत. असं असतानाही सरकार पातळीवर कोणतंही नियोजन, उपाययोजना, निर्णयक्षमता दिसून येत नाही. ही फारच दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील जीम चालकांनीसुद्धा प्रतिबंधात्मक उपाय स्वत:च सुचवले आहेत. यात सरकारला आणखी काही भर घालायची असेल तर तीही करता येईल. पण राज्यातील जीम तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा