महानगरपालिकेत भाजपा ज्या प्रकारे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे, तशाच प्रकारची कोंडी करण्यासाठी शिवसेनाही 'पारदर्शक' रणनीतीचा वापर करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री आणि काही प्रमुख नगरसेवकांसोबतची बैठक गुरुवारी सेनाभवनमध्ये पार पडली. जनतेला विकास आराखड्यात योग्य न्याय दिला जावा. सर्वसामान्य नागरिकांसाठी विकास आराखडा असला पाहिजे असा आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या बैठकीत मुंबईचा विकास आराखडा, जीएसटी या विषयावर चर्चा करण्यात आली.
विकास आराखड्यावर चर्चेसाठी आमदार आणि नगरसेवकांची बैठक रंगशारदामध्ये 2 मे रोजी ठेवण्यात आली आहे, तर जिल्हा परिषद निवडणूक आढावा बैठक 3 मे रोजी रंगशारदामध्ये ठेवण्यात आली आहे. यासह जीएसटी मार्गदर्शनासाठी सर्व मंत्री, आमदारांची बैठक मातोश्रीवर 4 मे रोजी होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विकास आरखड्यात छोटया-छोट्या मुद्दयांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. आरेच्या कारशेडबाबत चर्चा झाली आणि आरे कारशेडला विरोध आहे की नाही हे आता सभागृहात लवकरच कळेल. याबाबतही उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्या असल्याची माहिती विधानसभेमधील मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी जीएसटीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 1 जुलैला जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे नुकसान होऊ नये यासाठी पावले उचलावीत अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली होती. राज्यात जीएसटी लागू करण्यासाठी काही विधेयके पास करावी लागतील त्यासाठी 17 मेपासून विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात मात्र शिवसेनाची साथ भाजपाला विधिमंडळात मिळणार आहे की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.