Advertisement

महाराष्ट्रात येणारा सेमीकंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये गेला

यामुळे राज्याचे नुकसान झाल्याचा आरोप सर्वांकडून केला जात आहे.

महाराष्ट्रात येणारा सेमीकंडक्टरचा उद्योग गुजरातमध्ये गेला
SHARES

महाराष्ट्रात येणारा वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मितीचा (Vedanta Foxconn Semiconductor) उद्योग गुजरातमध्ये गेला आहे. यामुळे राज्याचे नुकसान झाल्याचा आरोप सर्वांकडून केला जात आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंपनीसोबत तीनवेळा बैठका झाल्या होत्या. जवळपास सर्व मुद्यांवर सहमती झाली असल्याचे म्हटले जाते. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अधिकाऱ्यांची जुलै महिन्यात अंतिम बैठक झाली होती. मात्र, हा उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये सुरू होणार आहे.

सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते.

ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने (Vedanta) तैवानमधील कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.

गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदान, इतर मदत जाहीर केली असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, वेदांता समूहाने मोफत 1000 एकर जमीन 99 वर्षांसाठी मागितली होती. त्याशिवाय स्वस्त, वाजवी दरात पाणी-वीज मागितली होती, असे सूत्रांनी सांगितले.

गुजरात मुख्यमंत्री कार्यालय, राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याकडूनही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर, वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनीने गुजरात सरकारसोबत झालेल्या व्यवहाराची माहिती दिली नाही.

गुजरात सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन यांच्यातील सामंजस्य करारावर या आठवड्यात स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांनीदेखील हा प्रकल्प आपल्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते.

भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ 2020 मध्ये 15 अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ 2026 पर्यंत 63 अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे.

तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.



हेही वाचा

सदा सरवणकरांचं पिस्तुल जप्त, अडचणीत वाढ होण्याची शक्यता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा