राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व राजकिय पक्षाचे नेते जोरदार तयारी करत आहेत. अशातच, भाजपनं राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील प्रत्येक बूथवर 'मतदारसंपर्क अभियान' राबवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भाजप मतदारांशी सपर्क साधणार आहे. यासाठी ४ ते ५ बूथ मिळून एक शक्तीकेंद्र निर्माण करण्यात आलं आहे. त्याशिवाय, राज्यातील सर्व २० हजार शक्तीकेंद्रांवर प्रत्येकी ५ हजार जणांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील बरघोस मतांनी विजयी होण्यासाठी यूतीमधील दोन्हा पक्षांनी राज्यभरात यात्रा काढल्या. या यात्रांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी सपर्क साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर कलम ३७० रद्द करण्यावरून राज्यातील सर्व मतदारसंघात कार्यक्रम घेतले जात आहेत.
या कार्यक्रमांची सुरुवात अमित शहा यांच्या गोरेगाव इथं झालेल्या भाषणानं झाली. या भाषणानंतर आता भाजपनं राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांशी वैयक्तिक संपर्काचं नियोजन केले आहे. तसंच या कामासाठी पक्षसंघटना कामाला लावली आहे. ४ ते ५ बूथचं मिळून एक शक्तीकेंद्र व त्यास एक प्रमुख अशी रचना भाजपनं ठेवली आहे. राज्यात असे २० हजार शक्तीकेंद्र आहेत. त्या प्रत्येक शक्तीकेंद्रावर ५ हजार जणांचं संमेलन घेण्यात येणार आहेत.
'मतदार संपर्क अभियान' या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळं भाजपच्या या मोहिमेचा मतदारांवर परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
महापालिकेच्या मोबाइल अॅपवर खड्ड्यांच्या तक्रारींच खच, ५ दिवसांत 'इतक्या' तक्रारी
आरोह वेलणकरनं अशी दिली चाहत्यांना ट्रिट