ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू नये ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि मी सर्वप्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती आणि आता याच मुद्द्यावर भाजप आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. खरं तर "वरातीमागून घोडे " असाच राज्यातील भाजप नेत्यांचा कारभार आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, अशी चर्चा राज्य सरकारमध्ये सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली आहे. या चर्चेमध्ये मी आणि छगन भुजबळ उपस्थित होते. तेव्हा आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडली की जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू नयेत, अशी भूमिका आम्ही मांडली.
हेही वाचा- “राष्ट्रवादी-शिवसेना यांची युती होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा”
"वराती मागून घोडे " असाच राज्यातील भाजप नेत्यांचा कारभार आहे .
— Office Of Vijay Wadettiwar (@VijaywaOfficial) June 21, 2021
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय सुटत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू नये ही मागणी मा. छगन भुजबळ साहेब व मी सर्व प्रथम मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. #obcreservation @VijayWadettiwar pic.twitter.com/25OVx9b3Zp
ही चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यामुळेच या निवडणुका पुढं ढकलण्याचा सरकारचा विचार आहे. विषय असा आहे की कुठूनही कितीही दबाव आला, तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत या निवडणुका आम्ही मंत्री असलो, तरी होऊ देणार नाही.
या प्रश्नावर आधीच चर्चा झालेली असताना भाजप (bjp) पुन्हा याच गोष्टीला घेऊन आंदोलन करत असेल, तर त्याला काय अर्थ आहे. हा प्रकार म्हणजे वरातीमागून घोडे असा आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
ओबीसी नेत्यांचं ऐक्य दाखवण्यासाठी जी चिंतन बैठक आयोजीत केली जात आहे. त्यात सर्वच ओबीसी नेते उपस्थित असतील. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, भाजपमधून पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे असतील, शिवसेनेचे संजय राठोड असतील, असे अनेक आमदार, खासदार, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते असतील, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
(vijay wadettiwar demands postpone of local elections due to unresolved obc reservation issue in maharashtra)