मुंबई-दिल्ली महामार्ग शहरातील वरळी सी-लिंकला जोडण्यासाठी ५० हजार कोटींचा रुपयांचा उड्डाणपूल अरबी समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच दिली.
एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितलं, पहिल्या युती सरकारच्या काळात मला काम करण्याची पुरेपूर संधी मिळाली. अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था वेगवान करणे आणि दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी माझ्यातली कल्पकता वापरली. यातूनच माझ्या कार्यकाळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वरळी-वांद्रे सी लिंक, ५५ उड्डाणपूल अशी अनेक कामं मी केली. त्या काळात शिवसेनाप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरे, नारायण राणे, दि.गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन अशा सर्व नेत्यांचा माझ्या कामाला पाठिंबा होता. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता. पण ती एक गोष्ट माझ्याकडून राहून गेली. हा पूल असता तर वेस्टर्न एक्स्प्रेस-वेवर गर्दी झाली नसती. हा पूल झाला नाही याचं मनात शल्य आहे. म्हणूनच हा पूल बांधायचं डोक्यात आहे.
हेही वाचा- ‘या’ पक्षाच्या जन्मानंतर महाराष्ट्रात दुसऱ्यांच्या जातीबद्दलचा द्वेष वाढला- राज ठाकरे
मी १ लाख कोटींंचा दिल्ली-मुंबई महामार्ग बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत येणार आहे. त्याचं ५० ते ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. या महामार्गाला वरळी सी लिंकसोबत जोडण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी ५० हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार आहे. संमती मिळाल्यास हा पूल बांधायला घेणार आहोत. त्यावर अभ्यास सुरु झाला आहे. मुंबईत मेट्रोच्या वरही पूल झाले असते तर वाहतूककोंडी सुटली असती. पण वरळी वांद्रे सी-लिंक प्रोजेक्ट करुन रस्ता वाढवू. कारण ही मुंबईची लाइफलाइन आहे, असंही यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितलं.
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हायवेमुळे वाहतूक कोंडी कमी होईल. तसंच सूरत- नाशिक- अहमदनगर- सोलापूर रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी ५० टक्क्यांनी कमी होईल अशी माहिती देखील नितीन गडकरी यांनी दिली.
समृद्धी महामार्गाच्या बाजूने मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर २५ ते ३० लाखांची नवी ५ शहरं विकसित करण्याची आवश्यकता असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं. मोठ्या शहरांवरील भार कमी करण्यासाठी मुंबई, पुण्याच्या विकासाऐवजी इतर टू-टायर सिटीचा विकास करणं गरजेचं आहे, असंही गडकरी म्हणाले.