लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसंच, सर्वपक्षीय नेते विधानसभेच्या तयारीला देखील लागले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) मतदान व्हावं, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. परंतु, 'तसं होणार नसेल तर, आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
'सरकार आणि निवडणूक आयोगाला ईव्हीएमवरच मतदान घेण्यात रस असेल, तर आपण निवडणूक प्रक्रियेत सहभागीच होऊ नये, अशी भूमिका विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी’, असं प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. तसंच, 'मतपत्रिकाच आल्या पाहिजेत हे माझं ठाम मत आहे. ते माझ्या पक्षात मान्य केलं जाईल हे मी आताच ठामपणं सांगू शकत नाही. पण हे मत पक्षात स्वीकारलं जावं, असा प्रयत्न मी करेन, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
इव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा अशी भूमिका काँग्रेस पक्षाची देखील आहे. अनेक ठिकाणी इव्हीएमबाबत आणि हॅकिंगच्याही तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसंच, निकालांबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. त्यामुळं पारदर्शकता आणणं आवश्यक असून, बॅलेट पेपर पुन्हा आणा, जनतेचा जो कौल असे तो मान्य करू, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं.
हेही वाचा -
अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता, मासेमारांना सतर्कतेचा इशारा
ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन