यवतमाळमध्ये 'अवनी' किंवा 'टी-१' वाघिणीला ठार मारण्यात आल्यापासून या वाघिणीला मारताना नियम मोडल्याचा आरोप करत प्राणीप्रेमींनी निषेध व्यक्त सुरू केला आहे. तर दुसरीकडे 'वन खात्याचं नावं बदलून शिकारी खातं असं करायला हवं', अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून वन मंत्रालयावर केली आहे.
यवतमाळमध्ये शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने अवनी वाघिणीला ठार मारलं. ठार मारण्याआधी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न वन पथकाकडून करण्यात आला. त्यावेळी वाघिणीनं चमुवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली, असा खुलासा वन खात्याने केला आहे.
वन विभागानं दिलेल्या या माहितीवर वन्यप्रेमींनी संशय व्यक्त केला आहे. वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न न करताच तिला गोळी घातली. तसंच, फक्त छायाचित्रासाठी वाघिणीला डार्ट लावण्यात आला असा संशय वन्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
त्यावर न्यायालयाकडून वाघिणीला मारण्याची परवानगी होती का? तिला बेशुद्ध पकडता आलं नसतं का? एक वन्यजीवप्रेमी म्हणून आपल्याला पडलेले हे प्रश्नं आहेत. आज अवनीला ठार केलं आहे, उद्या तिच्या बछड्याला किंवा आणखी दुसऱ्या वाघाचा बळी घेतला जाईल, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.