आई-वडिलांना म्हातारपणी त्रास देणं, त्यांना घरातून काढून टाकणं असे प्रकार देशात वाढत असून हे प्रकार रोखण्यासाठी लवकरच सरकार कठोर कायदा करणार आहे. त्यामुळे यापुढे जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना म्हातारपणी वाऱ्यावर सोडाल, तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
ज्येष्ठ नागरिकांचा वृद्धापकाळ चांगला जावा, त्यांचं जीवन सुसह्य व्हावं या संदर्भात भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना लवकरच सरकार कठोर कायदा करण्याचा विचार करत असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. दरम्यान, यावेळी वयाचा दाखलाही विना हेलपाटा मिळावा, त्यांना ओळखपत्र मिळावं, विधवा महिलांना शासनाची मदत मिळावी, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, निवृत्तीवेतन मिळावे आणि रुग्णालयांत स्पेशल सेल असावा यांसारख्या अन्य मुद्द्यांवर सर्वपक्षीय आमदारांनी शासनाचं लक्ष वेधलं.
जे सरकारी नोकरीत आहेत आणि आपल्या वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करत नसतील तर त्यांची वेतनवाढ देखील थांबवण्यात येईल, अशी माहिती बडोले यांनी सभागृहात दिली. तसेच, जी मुलं आपल्या पालकांचा सांभाळ करणार नाहीत, त्यांच्यावरही कारवाई होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
जेष्ठांना वयाचे दाखले वेळेत मिळावेत, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील. वयाचा दाखला विना हेलपाटा देण्याबाबत तलाठी, ग्रामसेवकांना सूचना करण्यात येईल. तसेच महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत अंतर्गत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही बडोले यांनी सांगितले.