मागील काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. डिझेलचे भाव ९० रूपयांवर गेल्याने १५ टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मुंबई मालवाहतूक टेम्पों महासंघाने घेतला आहे. १ मार्चपासून ही भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे महागणार आहेत.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला दिवसाला २ हजार गाड्या मुंबई, उपनगर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल भागात पुरवला जातो. आता मालवाहतूक दारांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं मालवाहतूकदार संघटनेने म्हटलं आहे. डिझेल ६१ रूपये होते तेव्हा ठरवण्यात आलेले टेम्पोभाडे आजही तेवढेच आहे. त्यामुळे १ मार्चपासून मालवाहतूक भांड्यात १५ टक्के वाढ करण्याची घोषणा मुंबई मालवाहतूक टेम्पों महासंघाने केली आहे.
एपीएमसीमधून जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाला, कांदा बटाटा, फळांच्या मालवाहतूक भाड्यात वाढ होणार असल्याने याचा भुर्दंड ग्राहकांना बसणार आहे. किरकोळ व्यापाऱ्यांकडून चढ्या दरात भाजीपाला, कांदा बटाटा, फळे विकली जाणार असल्याने महागाई वाढणार आहे.