मुंबई - रणजी ट्रॉफिच्या अंतिम सामन्यात गुजरातने दुसऱ्या दिवस अखेर 6 विकेट गमावत 291 धावा केल्या. गुजरातने मुंबईसमोर 63 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार पार्थिव पटेल आणि मनप्रित जुनेजा आजच्या सामन्याचे हिरो ठरले. पटेल 90 धावा तर जुनेजा 77 धावांवर बाद झाला. मुंबईच्या अभिषेक नायरने 3 विकेट्स आणि शार्दूल ठाकूरने 2 विकेट घेतल्या. तर बलविंदर सिंह सिंधूने एक विकेट घेतली. गुजरातने सामन्याची सुरूवात सावध केली. मात्र 106 धावांवर त्यांचे 3 गडी बाद झाल्यावर पटेल आणि जुनेजाने सावध खेळी करत 120 धावांची भागिदारी करुन गुजरातला मजबूत स्थितीत आणून ठेवले. चहापानानंतर पटेल आणि जुनेजा बाद झाले मात्र मुंबईच्या गोलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. दिवसअखेर संधूने रुजूल भट्टला बाद करत सामन्यात थोडी जान आणली. गांधी 17 तर कलारिया 16 धावांवर खेळत आहेत.