अखिल भारतीय पिकलबॉल संघटनेच्या (आयपा) वतीनं झालेल्या पाचव्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत बलाढ्य महाराष्ट्राचा दबदबा पाहायला मिळाला. महाराष्ट्रानं सलग तिसऱ्यांदा सांघिक जेतेपदावर नाव कोरलं. महाराष्ट्र संघानं आपल्या लौकिकानुसार एकहाती वर्चस्व राखत पुरुष व महिला गटात प्रत्येकी ७५ गुणांची कमाई केली. त्याचवेळी महाराष्ट्राचा कट्टर प्रतिस्पर्धी राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. राजस्थानने पुरुष गटात ४०, तर महिला गटात ५० गुण मिळविले.
बंगळुरू येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रानं एकूण ४ विजेतेपद पटकावली. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात कुलदीप महाजनने झारखंडच्या सोनू कुमार विश्वकर्माचे आव्हान ११-७, ११-७ असे परतवले. महिला गटात, महाराष्ट्राच्याच खेळाडूंमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात वृशाली ठाकरेने बाजी मारताना पूजा वाघ हिला ११-२, ११-१ असे सहज नमविले.
दुहेरीत मात्र मुंबईकरांचा जलवा पाहायला मिळाला. पुरुष दुहेरीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबईच्या अभिजीत मढभवी-सौमित्र कोरगावकर यांनी राजस्थानच्या निखिल सिंग राजपूत-प्रशांत कलानी यांचा ११-९, ११-९ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत मुंबईचा अनुभवी खेळाडू अतुल एडवर्ड आणि युवा साक्षी बावीस्कर या तगड्या जोडीला सुवर्णपदकासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. मात्र, अतुल-साक्षी यांनी राजस्थानच्या नीरज शर्मा-मेघा कपूर यांचा ११-४, ६-११, ११-८ असा पाडाव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.
हेही वाचा -
मुंबईची निवड समिती खेळाडूंच्या करिअरशी खेळतेय – दिलीप वेंगसरकर
'अन् विराट कोहलीनं मला ब्लॅकबेरी फोन गिफ्ट दिला'