गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा २ हजार २०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघरमधील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार आहेत. चाकरमान्यांना थेट त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत.
१६ जुलै २०२१ पासून या बसेसचं परतीच्या प्रवासाचं आरक्षण सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार सुमारे २ हजार २०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असं अनिल परब यांनी सांगितलं. गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरू राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील.
या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार आहे. चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचंही एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणं बंधनकारक करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसंच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती, परब यांनी दिलीय.
हेही वाचा