रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उपनगरांतील रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरातील गर्दुल्ल्यांचा वावर प्रवाशांसाठी उपद्रव ठरू लागला असून, रेल्वे आणि लोहमार्ग पोलिसांसाठी गर्दुल्ले डोके दुखी बनले आहेत. त्यामुळे आता गर्दुल्ल्यांना व्यसनमुक्त करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांच्या पातळीवर घेण्यात आला आहे.
याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मदत मिळावी यासाठी रेल्वे पोलीस प्रयत्नशील आहेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते भायखळा दरम्यान तसेच कु र्ला ते घाटकोपर, ठाणे ते कळवा, मुंब्रा, डोंबिवली ते कल्याण आणि हार्बर मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल, दादर ते खार, त्यापुढे अंधेरी ते बोरिवलीदरम्यान काही ठिकाणी गर्दुल्ल्यांचा मोठय़ा प्रमाणावर वावर असतो. कधी उड्डाणपुलांखाली, तर कधी पादचारी पुलांखाली ते आढळतात. काही वेळा रात्रीच्या सुमारास ते लोकलच्या डब्यात शिरकाव करतात.
गर्दुल्ल्यांनी प्रवाशांवर हल्ले के ल्याच्याही घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे गर्दुल्ल्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर असे गुन्हे दाखल असलेल्या गर्दुल्ल्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लोहमार्ग पोलिसांनी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी एक प्रस्तावच तयार केला असून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचं समजत. शिवाय, यासाठी शासनानं निधी उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गर्दुल्ल्यांच्या पुनर्वसनासाठी काही सामाजिक संस्थांनीही मदतीचे पाऊल पुढे टाकण्याची तयारी दर्शविली आहे. या संस्थांच्या मदतीने गर्दुल्ल्यांची अमलीपदार्थ सेवनापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. मात्र त्यावेळी त्यांच्याकडून कोणताही गुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.
गुन्हे दाखल असलेल्या ५०० गर्दुल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. गर्दुल्ल्यांचे पुनर्वसन करणाऱ्या २ ते ३ संस्थांशी चर्चाही सुरू केली असून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गर्दुल्ल्यांचे पुनर्वसन कसे होईल, याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.