आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमानं प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला आहे. ५ किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे ५ रुपये निश्चित करण्यात आलं आहे. सध्या बेस्टचे २ किमी अंतरासाठी किमान तिकीट ८ रुपये आहे. त्याशिवाय, एसी बसच्या पहिल्या टप्प्यासाठीही केवळ ६ रुपये तिकीट आकारलं जाणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या बेस्ट समिती बैठकीत हा प्रस्ताव मांडण्या येणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
नव्या प्रस्तावानुसार ५ किमीपर्यंतच्या प्रवासासाठी ५ रुपये तिकीट असणार आहे. १० किमी प्रवासासाठी १० रुपये, १५ किमीपर्यंत प्रवासासाठी १५ रुपये आणि १५ किमीपुढील प्रवासासाठी २० रुपये तिकीट असणार आहे. दैनंदिन पासचे दर ५० रुपये असणार आहेत.
बेस्ट उपक्रमानं तिकीट दर कमी करावे, अशी मागणी अनेक वर्षे होत आहे. पण आर्थिक अडचणींमुळं ते शक्य होत नव्हतं. मात्र, पालिकेनं आर्थिक निधी पुरवितानाच खासगीकरणाचा निर्णय घेतल्यानं बसताफा ७ हजारांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळं मुंबईकरांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे.
एसी बसचे तिकीट दरही आता स्वस्त होणार आहे. एसी बसचे तिकीट ५ किमीपर्यंत प्रवासासाठी ६ रुपये असणार आहे. १० किमीसाठी १३ रुपये, १५ किमीसाठी १९ रुपये आणि १५ किमीपुढील अंतरासाठी २५ रुपये असणार आहे. एसी बसचा दैनंदिन पास ६० रुपये असणार आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीची मंजुरी मिळाल्यास बेस्टच्या नवीन भाडेदर अंमलात येणार आहेत.
हेही वाचा -
संख्यावाचनातील बदल, तज्ज्ञांची समिती नेमूनच निर्णय घेणार- मुख्यमंत्री