बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असल्यामुळं कामगारांना वेळेत पगार देणं उपक्रमाला अवघड ठरत आहे. त्यामुळं बेस्ट संयुक्त कर्मचारी कृती समितीच्यावतीनं मंगळवारी वडाळा आगाराजवळ निदर्शनं करण्यात आली. यावेळी सुमारे ५०० कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. तसंच, बेस्टने पगार वेळेत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बेस्ट उपक्रम आर्थिक तोटा सहन करत असल्यामुळं कामगारांना पुढील काही महिने पगार उशीरा देण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बेस्ट संयुक्त कर्मचारी कृती समितीनं मुंबईकरांशी संवाद साधण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार, येत्या शुक्रवारपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर (सीएसएमटी) बेस्ट कामगार मुंबईकरांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर अन्य महत्वाच्या स्थानकांबाहेर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीविषयी मुंबईकरांना अवगत केलं जाणार आहे.
बेस्ट कामगार नेहमीच मुंबईकरांना सेवा पुरवत असतात. त्यामुळे त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीची माहिती मुंबईकरांना करून देण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. येत्या शुक्रवारी दुपारी सीएसएमटी स्थानकाबाहेर याचा शुभारंभ केला जाणार आहे. त्यावेळी बेस्ट कामगारांवर आलेल्या परिस्थितीची जाणीव कामगार संघटनांच्यावतीने मुंबईकरांना करून दिली जाणार आहे. तसंच, सीएसएमटीनंतर चर्चगेट, दादर यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांबाहेर हा उपक्रम राबवला जाणार आहे.
बेस्ट कामगारांचा फेब्रुवारी महिन्याचा पगार ३० मार्च रोजी आणि त्यानंतर पुढील ३ महिन्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेस देण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. मात्र, बेस्टने पगार देण्याच्या कालावधीत वाढ केल्याने कामगारांच्या आर्थिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. कामगारांची ही परिस्थिती लक्षात घेत बेस्ट संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या वतीनं वडाळा आगाराजवळ निदर्शनं करण्यात आली. त्यावेळी बेस्टनं पगार वेळेत देण्याची मागणी कामगारांनी केली.
हेही वाचा -
'मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी आणि डिपॉझीट वाचवून दाखवावे', विनोद तावडेंचे राज ठाकरेंना आव्हान
काँग्रेसची उमेदवारांची सहावी यादी जाहीर, मुंबई दक्षिण-मध्यमधून एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी