घाटकोपर-अंधेरी जोड रस्त्यावरील घाटकोपर डेपोजवळ असलेल्या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल धोकादायक ठरविण्यात आला. त्यामुळं शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास महापालिकेनं घाटकोपर-अंधेरी जोड रस्ता अचानक बंद केला आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देताच हा पूल वाहतूकीसाठी बंद केल्यान या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. त्याशिवाय, बेस्टचंही लाखोंचं नुकसान झालं आहे. लक्ष्मीबाग नाल्यावरील हा जोडरस्ता घाटकोपर बस आगाराच्या जवळ असून या पूलावरून बेस्टच्या सुमारे अडीचशे गाड्या धावतात. त्यामुळं बेस्टच्या घाटकोपर आगारातील बसगाड्यांचं नियोजन ढासळलं आहे. तसंच, बेस्टला दिवसांचं लाखो रुपयांचं नूकसान होत आहे.
घाटकोपर आगारातून घाटकोपर स्थानक पश्चिमेकडं जाणारे बस क्र. १० मर्यादित, ३०५, ३२९, ३८८ मर्या., ४१९, ४२१, ४७० मर्या., ५१७ मर्या., ४८८ मर्या. या मार्गावरील बसगाड्यांना पंतनगर पोलीस स्टेशन घाटकोपर रेल्वे स्टेशन पूर्व मार्गे पश्चिमेकडं जावं लागणार आहे. घाटकोपर आगारातून लाल बहादूर शास्त्री मार्गावर जाणाऱ्या बसगाड्या आता पूर्व द्रुतगती मार्गावरून गोदरेज, जोगेश्वरी विक्रोली लिंक मार्ग, टागोरनगर, गांधीनगर मार्गे लांबचा वळसा घालून धावत आहेत.
आयआयटीच्या सर्वेक्षणात घाटकोपर पूल धोकादायक ठरवण्यात आला आहे. पालिकेच्या पूल विभागानं संबंधित विभाग कार्यालयांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंचर घाटकोपरच्या पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळं अंधेरी-घाटकोपर जोडरस्त्याचाही वापर करता येणार नाही.
हा महत्त्वाचा पूल बंद झाल्यामुळं घाटकोपर आगारातून रेल्वे स्थानक पश्चिम येथे जाण्यासाठी पंतनगर व घाटकोपर स्टेशन (पूर्व) येथून उड्डाणपुलाचा प्रवाशांना वापर करावा लागत आहे. पंतनगर येथील रस्ता निमुळता असल्यानं व तेथे वडाळा-कासारवडवली मेट्रोचं काम सुरू असल्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा -
महालक्ष्मी रेसकोर्सजवळ भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
रमजान ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम अधिकाऱ्यांना लवकर पगार