कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेकडं दुर्लक्ष होत असल्यानं बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं संपाचा इशारा दिला होता. यासंदर्भात मागणी करून २ दिवस उलटल्यानंतरही बेस्ट उपक्रमाकडून चर्चेसाठी प्रतिसाद न मिळाल्याने बेस्टचे कर्मचारी ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नसल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांच्या आवाहनानंतर अखेर हे आदोलन मागे घेण्यात आलं आहे.
कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं केला. त्यानंतर संपाचा इशारा देण्यात आला. मात्र, बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर ६० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘बेस्ट’ उपक्रमातील जवळपास १०० हून अधिक कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचं कामगार संघटनेनं स्पष्ट केलं. सध्याच्या परिस्थितीत बंद पुकारणं योग्य नसल्याचं सांगत शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने वेगळी भूमिका घेतली होती. या बंदला कामगार सेनेचा पाठिंबा नसून कर्मचारी कामावर येतील, असं बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितलं होतं.
बेस्ट प्रशासन करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देत आहे. याशिवाय १० लाखांपर्यंत विमाही आहे व अन्य उपाययोजनाही करत आहे. मग बंद करून काय साधणार, असा सवालही त्यांनी केला होता. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी ‘काही मंडळी प्रशासनाबाबत अपप्रचार करून सेवेत खंड पाडत आहेत’ असे म्हटलं होतं. तसंच १८ मेपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता आणि अन्य बससेवा नियमितपणे कार्यरत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
हेही वाचा -
बेस्टचा आंदोलनाचा इशारा, अत्यावश्यक सेवेवर परिणाम होण्याची शक्यता
मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर