ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान विनातिकीट फिरणाऱ्या २४ हजार ५०० प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. या प्रवाशांकडून ६१ लाख १४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने अडीच महिन्यांत इतक्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. नियमित तिकीट तपासणीबरोबर 'फोर्टेस चेक' तपासणीचा यामध्ये अवलंब करण्यात आला होता.
लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यावर रेल्वेने टप्प्याटप्प्याने रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही प्रवासी गैरवापर करत आहेत. त्यामुळे विनातिकीट अथवा वेळेची मर्यादा न पाळणाऱ्या प्रवाशांची धरपकड करून दंडात्मक कारवाई केली आहे. ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या १५ हजार ५००, तर ठाणे-डोंबिवली आणि कल्याण स्थानकात खास फोर्टेस चेक पद्धतीने कारवाई करून तब्बल नऊ हजार प्रवाशांवर कारवाई केली आहे.
ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत ३७ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर फोर्टेस चेक करताना ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांतून २३ लाख ८० रुपये दंड वसूल केला.
फोर्टेस चेकमध्ये स्थानकात एकाच वेळी २५ ते ३० तिकीट तपासनीस आरपीएफच्या सुरक्षेसह प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करतात. गेल्या अडीच महिन्यांत ठाणे, डोंबिवली आणि कल्याण स्थानकांत २९ वेळा फोर्टेस चेक करण्यात आले. ८५० तिकीट तपासनीस आणि २५० आरपीएफ जवान यामध्ये सहभागी होते.
हेही वाचा -
रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित - राजेश टोपे
“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप