रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भविष्यात प्रवाशांना पनवेल ते कर्जत प्रवास करणं शक्य होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) च्या एमयुटीपी-३ अंतर्गत येणाऱ्या या मार्गासाठी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एमआरव्हीसी, राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्यात ‘वर्षां’ निवासस्थानी सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळं पनवेल ते कर्जत असा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे.
या मार्गासह विशेष म्हणजे नवीन उपनगरीय मार्गिका, ऐरोली ते कळवा उन्नत मार्ग आणि विरार ते डहाणू चौपदीरकरणासह अन्य प्रकल्पांना आता गती मिळणार आहे. दरम्यान या प्रकल्पांसाठी सामंजस्य करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आल्यामुळं प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात कोणतीही अडचण राहणार नाही. एमयुटीपी-३ प्रकल्पातील महत्वाच्या प्रकल्पांचे काम मार्गी लागावे, त्यांना त्वरीत निधी प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासन, एमएमआरडीए व सिडको यांच्यासोबत सामंजस्य करारही होणे महत्त्वाचे होते. त्यानुसार अखेर हे करार करण्यात आले.
एमयुटीपीमधील प्रकल्पांसाठी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँकेकडूनही ३,५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून त्याचाही करार करण्यात येणार असल्याचे समजतं. राज्य शासनाने भारतीय रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा-१ व टप्पा-२ च्या धर्तीवर ५०:५० टक्के आर्थिक सहभागातून हा प्रकल्प राबविण्यास मान्यता दिली आली आहे.
प्रकल्प आणि खर्च
एमयुटीपी-३ मधील पनवेल ते कर्जत नवीन उपनगरीय मार्गिका आणि विरार ते डहाणू तिसऱ्या आणि चौथी मार्गिकेच्या महत्त्वाच्या कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात करणार असल्याची माहिती मिळते.
हेही वाचा -
मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई
मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्या