देशातील ६ विमानतळांच्या खासगीकरणाचा घाट केंद्र सरकारनं घातला आहे. या खासगीकरणाला मुंबईसह देशभरातील विमानतळ कर्मचाऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. तर आता हा विरोध सरकारपर्यंत प्रकर्षानं पोहचवण्यासाठी विमानतळ कर्मचाऱ्यांनी थेट संपाचं हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी, ३० जानेवारीला देशभरातील विमानतळ कर्मचाऱ्यांचं संपासाठी गुप्त मतदान घेण्यात आलं असून यात मुंबईतील कर्मचार्यांचाही समावेश होता. मुंबईतील एएआयच्या कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात संपाच्यादृष्टीनं गुप्त मतदान घेण्यात आलं. त्यानुसार तब्बल ९६ टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजुनं कौल दिला आहे. त्यामुळे आता देशभरातील विमानतळ कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली तर मुंबईतील ९६ टक्के कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास मुंबईतील विमान सेवेला आणि पर्यायानं प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
लखनऊ, हैदराबाद, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी व तिरुअनंतपुरम या ६ विमानतळाचं खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. विमानतळाचं खासगीकरण झाल्यास विमानतळ कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचं म्हणत कर्मचाऱ्यांनी या खासगीकरणाला विरोध केला आहे. त्यामुळेच आता संपाचा निर्णय घेत बुधवारी देशभरातील विमानतळ कर्मचाऱ्यांचं गुप्त मतदान घेण्यात आलं. त्यानुसार बुधवारी अंधेरीतील एएआयच्या कार्यकारी संचालक कार्यालयात मुंबईतील विमानतळ कर्मचाऱ्यांनी गुप्त मतदान केलं.
मुंबईतील गुप्त मतदान प्रक्रियेत ८५३ कर्मचाऱ्यांनी-अधिकाऱ्यांनी पैकी ७७१ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या ७७१ कर्मचारी-अधिकाऱ्यांपैकी ७४१ कर्मचारी-अधिकार्यांनी संपाच्या बाजुनं कौल दिला. तर केवळ ३० कर्मचाऱ्यांनी संपाच्याविरोधात कौल दिला आहे. दरम्यान देशभरातील गुप्त मतदानाचा निकाल लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. तर त्यानंतर संप कधी आणि कसा करायचा याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तर या संपाला केवळ आणि केवळ केंद्र सरकारचं जबाबदार असेल असा इशाराही यानिमित्तानं विमानतळ कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
हेही वाचा -
लोअर परळ पुलाच्या पाडकामासाठी शनिवार-रविवारी २०५ लोकल फेऱ्या रद्द
मेट्रो-१ च्या स्टोअर व्हॅल्यू पास स्मार्टकार्डधारकांना मिळणार कॅशबॅक