आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली. गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळं एसटी महामंडळाचं नुकसान होत असून, या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, या संपातून अनेक कर्मचारी माघार घेत आहेत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेनं सोमवारी संपातून माघार घेतली. त्यामुळं मंगळवारी एसटीची वाहतूक पूर्ववत होईल, असा दावा महामंडळानं केला होता.
मात्र एसटी महामंडळाचा हा दावा फोल ठरला आहे. मंगळवारी २०९३४ कर्मचारी कामावर, तर २९१६ एसटी धावल्या. महामंडळाने कर्मचाऱ्यांवरील सर्व कारवाया मागे घेण्यात येतील. परंतु त्यासाठी कर्मचाऱ्यांची कामावर हजर व्हावे, असे परिपत्रक मंगळवारी काढलं.
एसटी महामंडळाच्या परिपत्रकात संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी २२ डिसेंबरपर्यंत, तर मराठावाडा, अमरावती व नागपूर येथील कर्मचाऱ्यांनी २३ डिसेंबरपर्यंत हजर होण्यास सांगितले. जे कर्मचारी कामावर हजर होतील, त्यांच्यावरील निलंबन, बडतर्फी शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार मागे घेण्यात येईल, असे म्हटले आहे.
याशिवाय ज्यांची सेवा समाप्ती झाली आहे, त्यांना कायदेशीर प्रक्रियेचे अनुपालन करून सेवा समाप्ती मागे घेतली जाईल. ज्यांची बदली केली आहे, त्यांची बदली रोखण्यात येईल, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मागे घेण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या संपाची दखल घेतली नाही. एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण हवे आहे.