मुंबई - सुरक्षित प्रवासासाठी चाकरमानी एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. पण अनेकदा रस्त्यातच एसटीमध्ये काही ना काही बिघाड होत असतात. याचा मनस्ताप चाकरमान्यांना सहन करावा लागतो. अशातच बिघडलेल्या एसटीच्या दुरुस्तीला देखील खूप वेळ लागतो. अशा वेळेस चाकरमान्यांना रस्त्यावर दुरस्तीची वाट बघत उभे राहावे लागते. त्यामुळे आता रात्री बारा वाजल्यानंतर महामार्गाच्या नजिकच्या आगारांमध्ये रात्री बारा ते सकाळी 9 वाजेपर्यत किमान एक वाहन चालवण्याचा परवाना असलेला कर्मचारी ठेवण्याच्या सूचना एसटी महामंडळ प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच मार्गस्थ असलेल्या एसटीमधील बिघाड वेळेत दुरुस्त झाला नाही तर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या यंत्र अभियंता, आगार व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
एसटीमध्ये बिघाड झाल्यास ज्या डेपोला त्याची माहिती मिळेल त्या डेपोने कोणत्याही परिस्थितीत बिघाड त्वरीत दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी हद्दीचा वाद घालू नये असे स्पष्टपणे परिपत्रकात म्हटले आहे.