येत्या १२ सप्टेंबरपासून देशातील विविध मार्गांवर ८० नव्या विशेष ट्रेन (४० जोड्या) धावणार असून, यासाठी १० सप्टेंबरपासून तिकीट आरक्षणास सुरूवात होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी दिली. (indian railways to run 40 pairs of new special trains from 12 September)
सध्या विविध रेल्वे मार्गांवर २३० विशेष एक्स्प्रेस ट्रेन्स चालवल्या जात आहेत. ज्यामध्ये ३० राजधानी एक्स्प्रेसचा देखील समावेश आहे. पुढील काही दिवसांमध्ये दसरा, दिवाळी, छठ पूजा सारखे सण येत आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करण्याची शक्यता गृहीत धरून तसंच कमी ट्रेनच्या उपलब्धतेमुळे गर्दी-गोंधळ उडू नये म्हणून रेल्वे बोर्डाने विशेष ट्रेनची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून प्रवासी संघटनांकडूनही विशेष रेल्वे वाढवण्याची मागणी सातत्याने होत होती.
त्या पार्श्वभूमीवर १२ सप्टेंबरपासून ४० पेअर्स विशेष ट्रेन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी दिली. या ट्रेन प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, लखनऊ, पाटणा, दिल्ली या मार्गांवर विशेष ट्रेन धावणार आहेत. त्याबाबत महाष्ट्र व पश्चिम बंगाल सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही कुमार यांनी सांगितलं.
हेही वाचा - राज्यांतर्गत प्रवासासाठी ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित
Railways to run 40 pairs of new special trains from September 12. Reservation for these will begin from September 10: Vinod Kumar Yadav, Chairman Railway Board (File pic) pic.twitter.com/fGw456HUrR
— ANI (@ANI) September 5, 2020
दरम्यान महाराष्ट्र सरकारने देखील राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला मंजुरी दिली आहे. या प्रवासासाठी बुकिंगही सुरू करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईतून परराज्यात जाणाऱ्या १६ व येणाऱ्या १६ गाड्यांचा समावेश आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी या विशेष गाड्यांनाच महाराष्ट्रातील स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत. याच गाड्यांतून प्रवास होणार असून नियमित गाड्या मात्र सुरू केलेल्या नाहीत. प्रवाशांना या गाड्यांचे १२० दिवस आगाऊ आरक्षण करता येणार आहे. त्यानुसार ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
बुकिंग सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनं एक पत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात 'सरकारनं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यास मुभा दिली असल्यानं रेल्वेद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करत आहोत. त्यासाठी प्रवासी आरक्षण सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे. २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाचं बुकिंग प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर करता येईल', असं नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र सरकारने दिली राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी