मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणता विचार नाही अशीही माहिती दिली. यासोबतच तूर्तास लॉकडाऊन लावण्याविषयी देखील कोणताच विचार नसल्याचं ते म्हणाले.
देशभरासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे. रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.
देशातील इतर राज्यांमध्ये कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. दरम्यान राज्यातही कठोर निर्बंध लावण्याविषयी चर्चा सुरू आहे. यावेळी मुंबईची लोकल पुन्हा बंद केली जाणार का? अशा चर्चा सुरू होती. यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू करण्यात येणार नाहीत. अशी माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून मिळाली होती. आता या वृत्ताला राजेश टोपे यांनीदेखील दुजोरा दिला आहे.
दरम्यान राज्यात बुधवारी २६,५३८ लोक संक्रमित आढळले आहेत. ५३३१ लोक बरे झाले आणि ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात ६७.५७ लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये ६५.२४ लाख लोक बरे झाले आहेत. तर १.४१ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा