महाराष्ट्रात २ दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तसंच सोमवारपासून दररोज रात्री ८ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू राहणार आहे. वीकेंड लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहे.
सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
शुक्रवार ९ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून सोमवार १२ एप्रिल सकाळी ७ वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लागू असेल. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील. रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन, खाजगी वाहतूक अशी सर्व प्रकारची परिवहन सेवा सुरु राहील. मात्र निम्म्या क्षमतेनं सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
गर्दीची ठिकाणं बंद राहणार
पुढचे काही दिवस मॉल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील, मात्र होम डिलीव्हरी सुरु असेल. मैदानं, बाग-बगिचे, समुद्र किनारे, गेट वे ऑफ इंडियासारखी पर्यटन स्थळे या काळात बंद राहतील, असं मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितलं.
काय सुरु काय बंद?
निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, हॉटेल, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक यांच्याशी चर्चा केली. शूटिंग सुरु राहतील, मात्र गर्दी होणार असेल, तिथे परवानगी दिली जाणार नाही. सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, क्षमतेच्या ५० टक्क्यानं सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार, असं मलिक यांनी सांगितलं.