केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते दिल्ली 'एक्स्प्रेस हाय वे'ची शनिवारी घोषणा केली. गडकरी यांनी हाती घेतलेली ही योजना वेळेत पूर्ण झाली, तर प्रवाशांना मुंबईहून केवळ १२ तासांमध्ये दिल्लीला पोहोचता येईल. या वर्षाखेरीस हायवेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरूवात होईल. मुंबईनजीक उरणमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट इथं आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. पूर्वी हा महामार्ग सध्याच्या एनएच-८ या राष्ट्रीय महामार्गाला समांतर बनवण्यात येणार होता. परंतु जमीन अधिग्रहणामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याने हा महामार्ग वळवण्यात आला.
या प्रकल्पावर अंदाजे १ लाख कोटी रुपये खर्च होणार आहे. हा महामार्ग मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला देखील जोडण्यात येणार आहे. या योजनेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये महामार्गाच्या कामाला सुरूवात होईल आणि पुढील अडीच वर्षांमध्ये महामार्गाचं काम पूर्ण होईल.
गडकरी यांनी राज्यातील इतर याेजनांच्या संदर्भात देखील माहिती दिली. ठाण्यापासून वसई- विरारपर्यंतच्या जल कनेक्टिव्हीटी योजनेला सागरमाला योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अॅम्पीबियस योजनेवर नाराजी व्यक्त करताना गडकरी म्हणाले, जमीन आणि समुद्रात चालणारी अॅम्पीबियस बस पर्यटनवृद्धी आणि प्रवाशांसाठी सोयीची ठरली असती. पण आता ती बस आपण सगळे मिळून 'गेट वे आॅफ इंडिया'जवळच्या समुद्रात विसर्जित करून टाकू.
हेही वाचा-
मुंबई-नागपूर अंतर होणार ६ तासांचं, हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव
गडकरींच्या कबुलीमुळे बेरोजगारीवर शिक्कामोर्तब - अशोक चव्हाण