मध्य रेल्वे मार्गावर कर्जत ते लोणावळा दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी २५ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान बहुतांश रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बस सोडण्याचे निर्देश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. त्यानुसार एसटी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पुणे, इथून नियमित बस व्यतिरिक्त दररोज १८० जादा बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. तसंच मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीच्या जादा २४ फेऱ्या सुरु करण्यात येत आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबई, पुणे, मिरज, सांगली, कोल्हापूर या मार्गावरील विविध रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने मुंबई विभागातून ५०, ठाणे विभागातून ५०, पुणे विभागातून ७०, आणि मिरज, सांगली व कोल्हापूर विभागातून १० अशा १८० जादा बस दररोज सोडण्याचं नियोजन केलं आहे.
उपरोक्त बस स्थानकात जादा बसचं नियोजन करण्यासाठी समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रवासी मागणीनुसार त्या-त्या बस स्थानकावरून विशेष बस सोडण्यात येतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
हेही वाचा-
सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस ८ दिवस रद्द
गणपती विशेष: ६० दिवस आधी मिळणार ‘एसटी’चं रिझर्व्हेशन