गणपतीच्या निमित्ताने मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने खूश खबर दिली आहे. त्यानुसार प्रवाशांना ६० दिवस आधीच एसटी बसचं आरक्षण करता येईल. या आरक्षणात जाताना आणि परतीच्या प्रवासाचंही त्यांना आरक्षण करता येईल. ही सुविधा प्रायोगिक तत्वावरील असून या सुविधेचा राज्यातील लाखो प्रवाशांना होईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
याआधी तिकीट आरक्षणाची कालमर्यादा ३० दिवस इतकी होती. त्यामुळे कोकणात आपापल्या गावी गेलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात आरक्षणासाठी बस स्थानकांवर ताटकळत उभं राहावं लागायचं. या सुविधेमुळे आता प्रवाशांना दोन्ही बाजूचं तिकीट आरक्षित करता येणार आहे.
ही आरक्षणाची सुविधा २७ जुलै (२६ जुलै मध्यरात्रीपासून) सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने तांत्रिक बदल करण्यासाठी महामंडळाची आरक्षण प्रणाली २६ जुलै संध्याकाळी ४ ते मध्यरात्री १२.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आलं आहे.
सोबतच एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बस व्यतिरिक्त २२०० जादा बसची देखील सोय केली आहे.
हेही वाचा-
बेस्ट आगारांमध्येही आता स्वस्त पार्किंगची सोय
सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस ८ दिवस रद्द