मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं रेल्वे आणि रस्ते वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली होती. सखल भागंत पावसाचं पाणी साचल्यानं मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतुककोंडी निर्माण झाली होती. तसंच, रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यानं तिन्ही मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे ठप्प होती. मात्र, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पावसानं विश्रांती घेतल्यानं ठप्प झालेली तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक हळूहळू सुरु झाली आहे. तसंच, रस्ते वाहतुकही पुर्वपदावर येत आहे.
The first local from CSMT departed at 3.17 hrs for Ambernath. Water level is slowly receding on tracks. We will keep you updated.
— Central Railway (@Central_Railway) 4 September 2019
मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वे रुळांवर पाणी साठल्याने मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास १२ तासांहून अधिक काळ ही वाहतूक विस्कळीत राहिल्यानंतर ती पूर्णपणे पूर्वपदावर आणण्याचं रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. पहाटे ४ वाजल्यापासून सीएसएमटीवरुन ठाण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्याशिवाय हार्बर मार्गावरील वाहतूक लवकरच सुरळीत होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अंबरनाथच्या दिशेनं पहिली लोकल ट्रेन रात्री ३.१७ वाजता सोडण्यात आली. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरही रात्रीपासूनच वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. काही विशेष गाड्यांबरोबरच चर्चगेटवरुन धिम्या आणि जलद गाड्या बुधवारी रात्री ९.३० वाजल्यापासून सोडण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
लोकल ट्रेन अंशत: सुरू, अंधेरीहून लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना