मुजोर रिक्षा चालकांची अरेरावी मुंबईकरांना नवी नाही. अशा रिक्षा चालकांना अद्दल घडवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अधूनमधून कारवाई करण्यात येते. तशीच कारवाई काही दिवसांपूर्वी विभागीय परिवहन कार्यालया (आरटीओ) तर्फे करण्यात आली. त्यात जवळचे भाडे नाकारणाऱ्या ७०० रिक्षा चालकांचे परवाने आरटीओने रद्द केले आहेत.
आरटीओकडून ही विशेष मोहीम २८ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान राबवण्यात आली. या मोहीमेंतर्गत अधिकाऱ्यांनी ग्राहक बनून रिक्षा चालकांच्या वर्तनाची तपासणी केली. या कारवाईविरोधात एखादा चालक न्यायालयात गेल्यास आरटीओची बाजू भक्कम राहावी म्हणून या कारवाईची व्हिडिओ शुटींग देखील करण्यात आली.
एकूण १४ भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत शहराच्या विविध विभागातील ५, २१२ रिक्षाचालक नियम पायदळी तुडवताना आढळले. यापैकी २,६०० रिक्षाचालकांचे परवाने जप्त करण्यात आले असून जवळचं भाडं नाकारणाऱ्या ७०० रिक्षा चालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या, नियमबाह्यपणे तीनहून अधिक प्रवाशांना रिक्षात बसवणाऱ्या, बॅच किंवा परवान्याविना रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर ही कारवाई करण्यात आली. या अभियानांतर्गत एकूण १७१ रिक्षाही ताब्यात घेण्यात आल्या.
रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराचा प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून हे अभियान पुढील काही महिने चालेल, असं परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितलं.
हेही वाचा-
पालघर स्थानकातील रेल्वे पोलिसांची ड्युटी ८ तास
परिवहन विभागाला ३५० कोटींचं टार्गेट