मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार व आरामदायी प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकलची सेवा सुरू केली आहे. मध्य व पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आली आहे. मात्र, या लोकलचं तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्यानं त्या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद फार कमी मिळत आहे. त्यामुळं सर्वसामान्यांनाही एसी लोकलमधून प्रवास करता यावा यासाठी आता पश्चिम रेल्वे प्रशासनानं नवीन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेच्या योजनेनुसार, सामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांनाही एसी लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी एक वेगळा प्रयोग करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मवर सामान्य लोकलची प्रतीक्षा करणारे प्रवासी एसी लोकलमधूनही प्रवास करू शकणार आहेत. त्यासाठी सामान्य लोकलचे तिकीट व वातानुकूलित लोकलच्या भाडेदरातील फरक डब्यात उपस्थित तिकीट तपासनीसाकडे भरून प्रवासाची मुभा मिळणार आहे.
याबाबत सध्या चाचपणी करण्यात येत असून, महिनाभरात त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामुळं प्रवासी संख्या, उत्पन्न वाढेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०२१ मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली. या लोकलच्या दिवसाकाठी बारा फेऱ्या होतात. चर्चगेट ते बोरिवली, विरारदरम्यान धावणाऱ्या या गाडीतून करोनापूर्वकाळात दर दिवशी १८ ते २० हजार प्रवाशी प्रवास करीत होते. करोनाकाळात ही लोकल काही महिने बंद ठेवण्यात आली होती. वातानुकूलित सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर तिला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. वातानुकूलित लोकल गाडीला प्रतिसाद मिळावा यासाठी पश्चिम रेल्वेने आता नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.